डॉ. स्वामीनाथन आणि त्यांचे बटाटा संशोधन

आज भारतात बटाट्याचे उत्पादन सहा कोटी टनांवर होते, याचे काही श्रेय डॉ. स्वामीनाथन यांनाही आहे.

बटाटा हे केवळ पौष्टिक अन्नच नाही, तर ते अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे आपल्या अन्न सुरक्षा योजनेत त्याला महत्त्वाचे स्थान देण्यात यायला हवे, कारण आता लागवडीखालील जिराइत शेती क्षेत्राचे माणशी प्रमाण घटत चालले आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धताही कमी होत चालली आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा विकास करून परिस्थितीकी सुरक्षा आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेतीसाठी शेतीपद्धत विकसित करायला हवी. पण या सर्वांपेक्षा आपण आपले कृषी आयात-निर्यात धोरण हे गरिबीत दिवस काढणाऱ्या तीन कोटी शेतकऱ्यांचे बळ वाढवून त्यांना सुरक्षा देईल, त्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण करणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी', असे डॉ. स्वामीनाथन यांनी 1999 मध्ये सांगितले होते.

भारतात 1960 च्या दशकात झालेली हरित क्रांती (ग्रीन रेव्होल्यूशन) आणि कालांतराने सदाहरित क्रांती (एव्हरग्रीन रेव्होल्यूशन)ची दिशा दाखवणारे म्हणून डॉ. एम. एस. स्वामीनाथन सर्वांना माहीत आहेत. गहू आणि तांदूळ (भात) या पिकांमध्ये उत्पादनवाढीला त्यांच्या प्रयत्नांनी मोठाच हातभार लागला आणि एकेकाळी धान्यासाठी परदेशांवर अवलंबून असलेला आपला देश आता त्या धान्यांची निर्यातही करू लागला आहे. अन्नाबाबतचे आपले परावलंबित्व नाहीसे करण्याचे श्रेय निर्विवादपणे डॉ. स्वामीनाथन यांचेच आहे. एका गोष्टीबाबत मात्र बऱ्याच जणांना फारशी माहिती नाही. ती म्हणजे शिक्षणासाठी परदेशात असताना त्यांनी त्यांच्या पीएच.डी.साठी बटाट्याचे वाण सुधारण्याचा विषय निवडला होता आणि त्यात त्यांना चांगलेच यश मिळाले आणि पीएच. डी. देखील. त्यांनी बटाट्यावरही चांगले काम केले होते. त्यांनी बटाट्याचे उत्पादन तर वाढवलेच, पण त्याचबरोबर त्याच्यात कीड प्रतिकारशक्तीही निर्माण केली. आज भारतात बटाट्याचे उत्पादन सहा कोटी टनांवर होते, याचे श्रेय काही प्रमाणात डॉ. स्वामीनाथन यांनाही आहे.

त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला, 1947 मध्येच त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत डॉ. हरभजन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आपले पदव्युत्तर संशोधन सुरू केले होते. सिंग हे 'प्लांट इंट्रोडक्शन डिव्हिजनचे' (वनस्पती ओळख विभागाचे) प्रमुख होते. तरुण वयातील स्वामीनाथन यांना त्यावेळी बटाट्यामध्ये खूपच रस होता. कारण मानवी आहार सुरक्षेमधील बटाट्याचे महत्त्व आणि त्याच्यातील आश्चर्यकारक जनुकीय आणि पेशी अनुवंशिकी गुणधर्म, त्याचबरोबर त्याचा सांस्कृतिक इतिहास. कृषी क्षेत्रात संशोधन करण्याची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1949 मध्ये युनेस्कोने (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, विज्ञान आणि सांस्कृतिक संघटनेने दिलेली फेलोशिप अभ्यासवृत्ती स्वीकारली आणि बटाट्याबाबतचे संशोधन सुरू ठेवण्यासाठी नेदरलँड्सला (हॉलंडला) गेले. वेजनिनजेन (Wageningen) येथील कृषी विद्यापीठात त्यांनी आपले काम सुरू केले.

तेथेच त्यांना समजले की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपमधील लोकांचा बटाटा हाच प्रमुख आहार होता. त्यामुळे त्या काळात तेथे जास्तीत जास्त बटाट्यांचे उत्पादन करण्याची गरज निर्माण झाली होती. परिणामी पारंपरिक पीकचक्रामध्ये बदल करावा लागला होता. पण याचा परिणाम असा झाला की 'गोल्डन नेमॅटोड' या किडीचा प्रश्न निर्माण झाला आणि नेदरलँड्समधील ‘पोल्डर' - Polder (समुद्रसपाटीखालील) जमिनींच्या विशिष्ट गुणधर्मामुळे तो खूपच गंभीर झाला होता. त्यामुळे स्वामीनाथन यांच्या प्राध्यापकांनी त्यांना विचारले की, ते 'गोल्डन नेमॅटोड' ला प्रतिकार करणारे जनुक (जीन्स) बटाट्यात घालण्यासाठी आणि अतिशीत - शून्य अंशाखाली तापमान असलेली हवा, तसेच हिमवृष्टीमुळे होणारे बटाट्याच्या पिकाचे नुकसान (फ्रॉस्ट डॅमेज) नुकसान टाळण्यासाठी सुरू असलेल्या संशोधनात मदत करतील का? स्वामीनाथन यांनी या प्रस्तावाला होकार दिला आणि ते डॉ. प्रक्केन प्रमुख असलेल्या अनुवंशशास्त्र संस्थेत काम करू लागले. ते त्यांना विविध जंगली जातीच्या सोलानम- Solanum - या वंशातील वनस्पतींचे जनुक, पीक म्हणून घेण्यात येणाऱ्या बटाट्यात (सोलानम ट्युबरोसम- Solanum tuberosum - मध्ये) टाकण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या 'मायक्रो ग्राफ्टिंग' तंत्राचे प्रमाणीकरण करण्यात यश आले. नंतर याच विषयात संशोधन सुरू ठेवण्यासाठी त्यांनी ट्रंपिंग्टन येथील प्लांट ब्रीडिंग इन्स्टिट्यूट, केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ ॲग्रिकल्चर, मध्ये 1950 मध्ये प्रवेश घेतला. तेथे त्यांनी प्रो. एच. डब्ल्यू. हॉवर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले आणि 1952 मध्ये त्यांना पीएच.डी. मिळाली.

डॉ. स्वामीनाथन यांनी ‘इंड्यूस्ड पॉलिपॉइडस इन नॉन-ट्यूबरस सोलानम्स अँड देअर क्रॉसेबिलिटी विथ पोटॅटो' या विषयावर सादर केलेले निबंध आणि त्यांनी डॉ. हॉवर्ड यांच्या साथीने 1953 मध्ये 'द सायटॉलॉजी अँड जेनेटिक्स ऑफ द पोटॅटो (सोलनम ट्यूबरोसम एल.) ॲन्ड रिलेटेड स्पीशीज' यावरील सविस्तर परीक्षण यांचा उल्लेख अप्रतिम शैक्षणिक शोधनिबंध म्हणून आजही बटाट्यावर संशोधन करणाऱ्यांकडून केला जातो. पीएच. डी. मिळवल्यानंतर डॉ. स्वामीनाथन बटाट्यावरील आपले संशोधन पुढे सुरू ठेवण्यासाठी अमेरिकेला गेले. तेथे विस्कॉन्सिन विद्यापीठात त्यांनी अनुवंशशास्त्रात संशोधक सहाय्यक म्हणून 1952-53 मध्ये काम केले. तेथे 'सोलानम जर्मप्लास्म' (Solanum germplasm) चा मोठा संग्रह जतन करण्यात आला होता. तेथील त्यांच्या कामामुळे बटाट्याच्या अनेक नव्या जातींची निपज करण्यास मदत झाली. यापैकी एक जात अलास्का फ्रॉस्टलेस ही अलास्कामध्ये लागवडीसाठी प्रसारित करण्यात आली. या जातीत सोलानम अकौल (2 एन = 48) या, पेरू देशातील अँडियन पर्वतराजीत वाढणाऱ्या चार हजार मीटर उंचीवरही वाढणाऱ्या हिमकणांना दाद न देणाऱ्या जातीचे जनुक टाकण्यात आले होते. यासाठी सोलानम अकौल (Solanum Acaule) मधील गुणसूत्रांचे प्रमाण दुप्पट करून ते सोलानम ट्यूबरोसम एल (2 एन = 96) या जातीच्या रोपांचा (मादी पालक म्हणून) वापर करून त्याच्याबरोबर संकरित करावे लागले होते. आर. डब्ल्यू. हौगस यांच्याबरोबर त्यांनी पेशी अनुवंशिकीबाबत संशोधन केले..

डॉ. स्वामीनाथन 1954 मध्ये भारतात परतले. परंतु दिल्लीत काही अपवाद वगळता बटाट्यांना फुलोरा येत नसल्याने त्यांना बटाट्याबाबतचे संशोधन पुढे करता येणे शक्य झाले नाही. त्यामुळे त्यांनी भात, गहू, बार्ली, कपाशी, टोमॅटो, ज्यूट इ. अन्य पिकांच्या संशोधनावर भर दिला. दरम्यान त्यांनी भारतात 18 व्या शतकापासून पिकवल्या जाणाऱ्या बटाट्यांच्या मूळ जातीचे बारकाईने संशोधन केले. त्यावरील शोधनिबंध (स्वामीनाथन आणि मगून 1961) या विषयावरील सविस्तर अभ्यास म्हणून ओळखला जातो. वाढते उत्पन्न, शहरीकरण, तसेच झटपट आहार उद्योग (फास्ट फूड इंडस्ट्री) आणि लोकांच्या खाण्याबाबतच्या बदलत्या सवयींमुळे बटाट्याची मागणी वाढणे शक्य होते. याबाबतचा एक अंदाज होता की 2020 पर्यंत जगातील कंदमुळांच्या आहाराची मागणी 37 टक्क्यांनी वाढेल. त्यात बटाट्याचा वाटा 41.9 टक्के असेल. अन्न आणि शेती संघटनेच्या (Food and Agriculture Organization - एफएओच्या) अंदाजानुसार 2019 मध्ये बटाट्याचे उत्पादन 37 कोटी मेट्रिक टन होते.

डॉ. स्वामीनाथन यांच्या मते बटाट्याच्या उत्पादनाला मर्यादा आणणारे घटक प्रामुख्याने अनेक प्रकारच्या किडी आणि रोग, रोगप्रतिकारशक्ती असलेल्या वाणांची निर्मिती आणि वाटप करण्यातील अडचणी, शीत कोठारांची कमी संख्या आणि बटाट्याच्या दरात होणारे मोठे चढउतार हे आहेत. विषारी कीटकनियंत्रक औषधे वापरल्याने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणत हानी होते. तसेच नव्याने आढळणाऱ्या काही बुरशीजन्य रोगांचाही प्रश्न आहेच. लेट ब्लाइट (Phytophthra infestans) या बुरशीच्या जातींच्या प्रादुर्भावामुळे त्यावर तातडीने उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली होती. त्यावर जॉन निडरहौसर (John Niederhauser) या 1990 च्या जागतिक अन्न पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाने सुरू केलेल्या मेक्सिको सिटीजवळच्या टोलुका व्हॅलीत सुरू केलेल्या 'हॉट स्पॉट स्क्रीनिंग' केंद्रामुळे बटाटा संशोधकांना मोठीच मदत झाली.

सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राने केलेल्या (सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट - CPRI) ने अंदाज केला होता की 2020 मध्ये भारतात 20 लाख हेक्टर क्षेत्रात बटाटा पिकवला जाईल, म्हणजे बटाट्याचे उत्पादन पाच कोटी टन होईल. भारतामध्ये सध्या हेक्टरी 25 टन बटाटा पिकतो. पण हे प्रमाण युक्रेन सरासरी उत्पादनाच्या केवळ निम्मे आहे. त्यामुळे डॉ. स्वामीनाथन यांना वाटत होते की, ते प्रमाण गाठणे फारसे अवघड जाऊ नये. पण प्रत्यक्षात उत्पादन किती होते ते बटाटा शेतीतील उत्पादन खर्च, पत्करावा लागलेला धोका आणि मिळणारे उत्पन्न (कॉस्ट- रिस्क - रिटर्न) या रचनेवर अवलंबून राहील, असेही त्यांनी म्हटले होते. त्यालाही कारण होते. ते म्हणजे अचानक कोसळणाऱ्या किंमतींमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. जोडीला पिकाचे उत्पादन आणि काढणीनंतरचे तंत्रज्ञान यांचा मेळ जमत नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही विक्रमी पीक आले तरी त्याचा फायदा मिळत नाही. यावर उपाय म्हणून डॉ. स्वामीनाथन यांनी 2010 मध्ये एक पाच कलमी कृती आराखडा सुचवला होता. देशातील उत्पादन पाच ते सहा कोटी टनांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले, तर बटाटा आपल्या अन्नसुरक्षितेत महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे 2020-21 या काळात बटाट्याच्या लागवडीखालील क्षेत्र 20.117 लाखावर गेले होते. आणि उत्पादन 5 कोटी 31 लाख टन झाले होते.


हेही वाचा : डॉ. स्वामीनाथन यांनी विलासराव देशमुख यांना लिहिलेले पत्र


डॉ. स्वामीनाथन यांनी महत्त्वाची बाब म्हणून सांगितलेली बटाटा बीज निर्मिती ही विकासासाठी महत्त्वाची गरज होती. त्यांच्या सिमला येथील केंद्रीय बटाटा संशोधन केंद्रात संशोधकांचे नेतृत्व करणाऱ्या महेश दत्त उपाध्याय या शिष्याने हे काम केले. उपाध्याय हे भारतीय कृषी संशोधन केंद्रात (Indian Agriculture Reserch Institue- IARI) 1963 च्या गटात डॉ. स्वामीनाथन यांचे पीएच.डी.चे विद्यार्थी होते. ते गुणसूत्राच्या अनुवंशिकी विश्लेषणा (chromosome cytoanalysis) बाबतचे जादूगार समजले जातात. त्यांनी उत्तर भारतासाठी अ‍ॅफिडचा - माव्याचा, प्रादुर्भाव नसण्याच्या काळात बटाट्याच्या क्लोनल सीड प्रॉडक्शनचे तंत्रज्ञान विकसित केले. डॉ. स्वामीनाथन यांनी सुचवलेला आणखी एक मार्ग म्हणजे टू पोटॅटो सीड (टीपीएस TPS) - खऱ्या बटाटा बीचे उत्पादन करण्यात येऊन ते मोठ्या प्रमाणात वापरण्यात यावे. कारण त्यात अनेक गुण आहेत - त्याला किडी आणि रोगांची बाधा होत नाही, आणि मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी हे बी विकेंद्रीकरणाने गावांमध्येही उत्पन्न करता येऊ शकते. त्यांनी 1978 मध्ये जालंदर येथे सुचवलेल्या अ‍ॅपोमिक्सि तंत्रज्ञानाने टीपीएसचा प्रसार होण्यासाठी मोठीच मदत झाली आहे. कारण सुदृढ बटाट्याच्या लहान आकाराच्या फुलांपासून तयार केलेले बी - टीपीएस हे बटाट्याच्या 'लेट ब्लाइट' या रोगाला कारणीभूत असलेल्या पी.इनफेस्टन्स (P.infestans)ला उत्तर आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टीपीएसचा वापर केला तर केवळ 100 ग्रॅम बी एका हेक्टरसाठी पुरे होते. त्यामुळे खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते, कारण लागवडीसाठी लागणाऱ्या शेतमजुरांची आवश्यकता खूपच कमी होते. भारत हा बटाट्याच्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. 21 लाख हेक्टरमध्ये टीपीएस आणि टीपीएसच्या बटाट्याचे पीक घेतले जाते. सहा संकरित वाणांची निर्मितीही केंद्रीय बटाटा संशोधन केंद्राने केली. ही सहा संकरित वाणे मूलतः पेरू देशातील लिमा येथील संशोधन निर्माण करण्यात आली. आणि त्यांची गुणवत्ता चाचणी भारतात करण्यात आली. डॉ. स्वामीनाथन यांच्या मते किडी आणि रोगप्रतिकारशक्ती यांशिवाय बटाट्याच्या आकारामध्ये वाढ व्हायला हवी. मेंडेलच्या आणि रेण्विक पैदास तंत्राचा वापर केल्यास हे शक्य होईल. 

त्यांना असेही वाटत होते की, बटाट्यावर आधारित शेतीपद्धत विकसित करायला हवी. त्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करायला हवा. अचूकतेने केलेली शेती नैसर्गिक संसाधनांची बचत करण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याने छोट्या शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ होते. शिवाय रासायनिक खते, कीटकनाशके यांचे प्रमाणही कमी करते. यासाठीच्या पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित करायला हव्यात. याबरोबरच काढणीनंतरचे तंत्रज्ञान, प्रक्रिया यांचा वापर करायला हवा. भाव वाढतील तेव्हा विक्री करता यावी म्हणून शीतगृहांमध्ये आपला माल साठवून ठेवण्यात येतो. त्यामुळे अल्पावधीत शीतगृहे भरून जातात. क्लोरोफ्लुरोकार्बन या घातक वायूशिवाय अशी शीतगृहे निर्माण करायला हवी. कारण हा वायू ओझोन थराला धोका निर्माण करतो. याबरोबरच विविध उपयोगांसाठी बटाट्याच्या खास वेगवेगळ्या जाती निर्माण केल्या पाहिजेत. कारण आता बटाट्यापासून विविध खाद्यपदार्थ निर्माण केले जात आहेत आणि त्यांना मागणीही चांगली आहे, असेही ते म्हणत.

असे असले तरी आनुवंशिकतेच्या वापराने - जेनेटिकली मॉडिफाइड तंत्राने - बटाट्याच्या अनेक सुधारित जाती तयार करता येतात. परंतु त्यांचा वापर करण्यापूर्वी त्यांच्यापासून काही धोका तर नाही ना, याची खात्री करून घ्यायला हवी आणि नंतरच त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करावे असेही त्यांनी म्हटले होते. कारण व्यावसायिक कंपन्यांना केवळ आपला फायदा वाढवायचा असतो. त्यामुळे त्या ग्राहकांच्या हिताकडे फारसे लक्ष देत नाहीत. भारतासारख्या देशात अन्नाच्या खरेदीसाठी उत्पन्नाचा 60 टक्के भाग उपयोगात आणला जातो, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष पुरवायला हवे. त्यासाठी 'नॅशनल कमिशन फॉर जेनेटिक मॉडिफिकेशन फॉर फूड अँड हेल्थ स्क्रूटिनी' स्थापन करण्यात यावे अशी सूचना त्यांनी केली होती.

बटाटा हे केवळ पौष्टिक अन्नच नाही, तर ते अनेकांना रोजगाराची संधी मिळवून देणारे पीक आहे. त्यामुळे आपल्या अन्न सुरक्षा योजनेत त्याला महत्त्वाचे स्थान देण्यात यायला हवे, कारण आता लागवडीखालील जिराइत शेती क्षेत्राचे माणशी प्रमाण घटत चालले आहे. त्याचबरोबर पाण्याची उपलब्धताही कमी होत चालली आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा विकास करून परिस्थितीकी सुरक्षा आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत शेतीसाठी शेतीपद्धत विकसित करायला हवी. आणि त्यासाठी 'आपण तंत्रज्ञानात आपल्या पारंपरिक शहाणपणाचा विज्ञानाशी मेळ घालायला हवा. आपल्या धोरणातही अर्थशास्त्र आणि परिस्थितीकी आणि समानता यांचा मेळ घालायला हवा. पण या सर्वांपेक्षा आपण आपले कृषी आयात-निर्यात धोरण हे गरिबीत दिवस काढणाऱ्या तीन कोटी शेतकऱ्यांचे बळ वाढवून त्यांना सुरक्षा देईल, त्यांच्या उपजीविकेला धोका निर्माण करणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी', असे डॉ. स्वामीनाथन यांनी 1999 मध्ये सांगितले होते.

त्यांचे हे सांगणे कायम ध्यानात ठेवायला हवे.

(मुख्य आधार भारतीय विद्या भवन, मुंबई. ने प्रकाशित केलेले आर. डी. अय्यर, अनिल कुमार आणि रोहिणी अय्यर यांनी लिहिलेले ‘एम. एस. स्वामीनाथन, सायन्टिस्ट, ह्युमॅनिस्ट, कॉन्झर्व्हेशनिस्ट' हे पुस्तक. नवी आवृत्ती 2021)

- आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक, ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: agriculture potato research agrarian crisis green revolution शेती स्वामिनाथन आ श्री केतकर बटाटा Load More Tags

Comments:

मंजिरी देशमुख

स्वामीनाथन् यांचे कायॅ अतिशय मोलाचे… अतुल देऊळगांवकर यांच्या “ स्वामीनाथन “ या पुस्तकातून या विज्ञानमयी, करुणामयी व्यक्तिमत्वाची ओळख झालीच होती… श्री केतकरांच्या लेखातूनही उपयुक्त माहीती मिळाली…

Add Comment