अलेक्झांडर सोल्झेनित्सिन आणि आपण

‘ऑगस्ट 1914’ या कादंबरीच्या निमित्ताने...

lawliberty.org

'ऑगस्ट 1914' ही कादंबरी (मिकाएल ग्लेनीने अनुवाद केलेली) बरेच दिवस माझ्याकडे होती. सोनेरी पार्श्वभूमीवरील काळ्या अक्षरांतील नाव पाहूनच तिच्याबद्दल कुतूहल वाटून ती विकत घेतली होती. परंतु तिचा जवळपास सातशे पानांचा कथानकाचा भाग आणि कादंबरीतील असंख्य व्यक्तिरेखांबाबतच्या माहितीची आणि नकाशे इत्यादींची 22 पाने पाहून ती खूप वर्षे मागे ठेवली गेली होती. पण मध्यंतरीच्या काळात वेळ मिळाल्याने ती वाचली आणि नंतर त्यातील काही प्रसंग व सध्याच्या काळातील रशिया-युक्रेन युद्ध यांच्यात किती साधर्म्य आहे हे त्या युद्धाच्या उलट-सुलट बातम्या वाचताना जाणवत राहिले. म्हणजे ‘रशियन फौजांनी आक्रमण केले’ या बातमीनंतर लगेच ‘रशियन फौजांची माघार’, ‘युक्रेनला जबरदस्त हादरा’ आणि लगेच ‘रशियन सैन्याची मोठी हानी’, इ. बातम्या वाचताना हे सतत जाणवत राहिले.

काही पुस्तके वाचताना, त्यातील काही प्रसंग वाचताना आपल्याला एकदम वर्तमानातील काही गोष्टी आठवू लागतात. हे काय, असे का वाटते आहे असा प्रश्न तेव्हा पडतो. आणि नंतरदेखील असे अनेकदा वाटण्याजोगे प्रसंग त्या पुस्तकातील कथानकात येतात. अनेकांना असा अनुभव आला असेल. अलेक्झांडर सोल्झेनित्सिन हे नाव अनेकांना ठाऊक असते, ते तो साहित्यासाठीच्या नोबेल पारितोषिकाचा मानकरी म्हणून. आणि तेव्हाच्या सोविएत युनियनच्या भीतीमुळे तो ते पारितोषिक, पदक व बक्षिसाची 80,000 डॉलरची रक्कम स्वीकारण्यासाठी जाऊ शकला नाही. कारण त्याला भीती होती की, सोविएत अधिकारी नंतर त्याला त्याच्या कुटुंबाकडे परत येऊ देणार नाहीत. त्याच्या देशात त्याचे साहित्य प्रकाशित होऊ दिले जात नव्हते. फक्त एकच कादंबरी तेथे प्रकाशित करण्याला 1962 मध्ये परवानगी देण्यात आली होती आणि तीदेखील निकिता क्रुशॉव्ह यांनी आश्रयदाता-पेट्रन म्हणून भूमिका बजावल्याने. ती कादंबरी ‘ए डे इन द लाइफ ऑफ इवान डेनिसोविच’ (A Day In The Life Of Denisovich) ही होती. ती सोविएत युनियनमध्ये प्रकाशित करण्यात आली खरी, पण प्रकाशित होताच लगेचच तिचे मुद्रण थांबवण्यात आले होते.

ए डे इन द लाइफ ऑफ इवान डेनिसोविच आणि द फर्स्ट सर्कल या दोन कादंबऱ्यांमध्ये सोल्झेनित्सिनने त्याची कॉन्सेंट्रेशन कॅम्पमधील आठ वर्षे आणि त्याच्या गुन्ह्यासाठी हद्दपार करण्यात आल्यानंतरचा तीन वर्षांचा अनुभव यांचा कथानक तयार करण्याची सामुग्री - कच्चा माल म्हणून वापर केला आहे. 1945 मध्ये तरुण कॅप्टन म्हणून तो रशियन सैन्यात होता. त्याला रशियन सैन्याच्या प्रतिगुप्तहेर संघटनेने (SMMERSH) अटक केली होती. शाळेत बरोबर असलेल्या मित्राला लिहिलेल्या पत्रात स्टॅलिनबाबत मानहानीकारक शेरेबाजी केल्याचा आरोप सोल्झेनित्सिनवर ठेवण्यात आला होता व त्याला शिक्षा सुनावण्यात आली होती. अलेक्झांडर सोल्झेनित्सिन 1950 च्या दशकात कर्करोगाच्या वॉर्डमध्ये रोगी म्हणून होता. पण कालांतराने तो त्यातून बरा झाला. 1967 मध्ये त्याने म्हटले होते, ‘आमच्या साहित्यावर अनेक दशके सेन्सॉरशिपने येत असलेले दडपण सहन करणे आता अशक्य झाले आहे... कोणीही सत्याकडे जाणारा मार्ग बंद करू शकत नाही. आणि सत्यशोधाच्या मार्गावरून जाण्याकरिता मी अगदी मरण पत्करायलाही तयार आहे.’

सोविएत अधिकाऱ्यांनी त्याला एकाकी ठेवले आणि सोविएत युनियनच्या लेखकांच्या संघटनेने त्याला संघटनेतून काढून टाकले होते. त्याला सरकारी ऐतिहासिक कागदपत्रे (पुराभिलेख) पाहण्याची बंदी करण्यात आली होती. पण त्याची पर्वा न करता त्याने ‘ऑगस्ट 1914’ (August 1914) ही पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळातील कादंबरी लिहिली. आश्चर्याची वाटावी अशी बाब म्हणजे त्याने म्हटले होते की, ही कादंबरी म्हणजे अनेक भागांपैकी पहिला भाग आहे आणि हा प्रकल्प पुरा करण्याला 20 वर्षेदेखील लागतील. (‘रेड व्हील्स’ मालिकेतील दुसरी कादंबरी ‘ऑगस्ट 1916’ या नावाने दहा वर्षांनंतर प्रकाशित झाली.) ऑगस्ट 1914 ही कादंबरी प्रथम 1971 साली प्रकाशित केली गेली. नंतर सुधारित आणि बरीच भर घालून ती 1981 साली प्रकाशित करण्यात आली. ऑगस्ट 1914 ही कादंबरी (मिकाएल ग्लेनीने अनुवाद केलेली) बरेच दिवस माझ्याकडे होती. सोनेरी पार्श्वभूमीवरील काळ्या अक्षरांतील नाव पाहूनच तिच्याबद्दल कुतूहल वाटून ती विकत घेतली होती. परंतु तिचा जवळपास सातशे पानांचा कथानकाचा भाग आणि कादंबरीतील असंख्य व्यक्तिरेखांबाबतच्या माहितीची आणि नकाशे इत्यादींची 22 पाने पाहून ती खूप वर्षे मागे ठेवली गेली होती. पण मध्यंतरीच्या काळात वेळ मिळाल्याने ती वाचली आणि नंतर त्यातील काही प्रसंग व सध्याच्या काळातील रशिया-युक्रेन युद्ध यांच्यात किती साधर्म्य आहे हे त्या युद्धाच्या उलट-सुलट बातम्या वाचताना जाणवत राहिले. म्हणजे ‘रशियन फौजांनी आक्रमण केले’ या बातमीनंतर लगेच ‘रशियन फौजांची माघार’, ‘युक्रेनला जबरदस्त हादरा’ आणि लगेच ‘रशियन सैन्याची मोठी हानी’, इ. बातम्या वाचताना हे सतत जाणवत राहिले.

त्यामुळे पुन्हा एकदा तिची उजळणी केली, तेव्हा केवळ रशिया-युक्रेन युद्धच नाही तर आपल्याकडील काही घटनांशीही कादंबरीतील प्रसंगांचे काहीतरी नाते असावे असे वाटत राहिले. या प्रदीर्घ कादंबरीतील अनेक घटना वाचताना विस्मय होतो. रशियन इंपीरिअल आर्मीच्या पूर्व प्रशियामध्ये टॅन्नेनबर्गच्या लढाईत झालेल्या पराभवाबाबतची ही कादंबरी आहे. इतिहासातील घटना आणि त्यांना कल्पनेची जोड यांचे मिश्रण यात आहे. याबरोबरच वर्तमानपत्रांतील बातम्यांची शीर्षके आणि बातम्यांचा थोडा भाग वापरण्यात आला आहे, तसेच चित्रपटातील प्रसंगांचाही त्याने पटकथेच्या रूपातच वापर केला आहे, असे हे लेखनाचे स्वरूप आहे.

कर्नल व्होरोटिंत्सेव्ह याला ग्रँड ड्यूक, जो रशियन सैन्याचा मुख्यालयातील सुप्रीम कमांडर आहे तो पूर्व प्रशियात आक्रमण करून जाणाऱ्या रशियन सेकंड आर्मीकडे पाठवतो. तेथे जनरल अलेक्झांडर सॅमसोनोव्ह याच्या हाताखाली त्याला काम करायचे असते. व्होरोटिंत्सेव्हवर या सेकंड आर्मीचे काय होत आहे, हे कळवण्याची जबाबदारी असते. त्याचवेळी सेकंड आर्मीतील स्टाफ कर्नलला फर्स्ट आर्मीकडे तशाच कामासाठी रवाना केले जाते. या दोन्ही फौजांतील अंतर प्रचंड आहे आणि त्यांच्यातील संपर्क यंत्रणा अगदीच खराब आहे. त्यामुळे खूच अडचणी येताहेत. रशियन फौजांची लढाईसाठी कोणत्याही प्रकारची तयारी करून घेण्यात आलेली नाही. व्होरोटिंत्सेव्हला आघाडीवरील परिस्थितीची बारकाईने पाहणी करून त्याबाबत ग्रँड ड्यूकला कळवायला सांगण्यात आले आहे. 26 ऑगस्टला चार दिवसांच्या टान्नेनबर्गच्या लढाईला सुरुवात होते आणि व्होरोटिंत्सेव्हला कळून चुकते की, तो आता त्या लढाईच्या निकालावर परिणाम होईल अशा वेळेवर आपल्या मुख्यालयात जाऊ शकणार नाही. म्हणून तो सेकंड आर्मीबरोबरच त्यांना त्याच्याकडून शक्य होईल ती मदत करण्यासाठी थांबतो.

युद्धभूमीवरील तसेच इतर अनेक ठिकाणच्या व्यक्तिरेखांची आणि तेथे तेथे झालेल्या घटनांची वर्णने या कादंबरीत आहेत, मध्येच काही नागरी आयुष्यातील प्रसंगही आहेत. त्यामुळे ती वारंवार पुढे-मागे झाल्यासारखी वाटते. झारच्या राज्यातील पुरेशी तयारी नसलेल्या फौजांचे अपयश यात वर्णन केले आहे. बॅटल ऑफ टॅनबर्ग म्हणून नंतरच्या काळात ओळखल्या गेलेल्या लढाईतील लाजिरवाण्या पराभवानंतरची मनस्थिती रशियन कमांडर सॅमसोनोव्हला पछाडते. पराभवाची बातमी झारला कशी कळवायची या चिंतेने तो ग्रासला जातो आणि सरतेशेवटी आत्महत्या करतो. हातात रिव्हॉल्व्हर आणि डोक्याला गोळीची जखम असलेले त्याचे पार्थिव जर्मन शोधपथकाला सापडते. या पराभवाची बातमी सांगणाऱ्या झिलिन्सकीवरच भलते आरोप करण्यात येतात आणि आपला विजय झाला असून आम्ही तो साजरा करीत असताना तू असे कसे सांगतोस? असे अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्याला विचारले जाते. पण झिलिन्स्की तरीही आपण खरे सांगत आहोत असे म्हणतो. त्यावर कर्नल व्होरोटिंत्सेव्ह त्याला म्हणतो की, फ्रान्सला खुश करण्यासाठीच आपले सैन्य धाडण्याचा निर्णय घेण्यात आला, तोही फौजा एकत्र झाल्यावर केवळ 15 दिवसांत. तेव्हा फौजांची एक तृतीयांश तयारीही झाली नव्हती अशा वेळी हा फौजा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


हेही वाचा : महाराष्ट्राची लोकयात्रा : एक मौलिक अक्षरलेणे - अभय टिळक


झिलिन्स्की म्हणतो की, असे म्हणणे हे रशियन फौजांच्या राष्ट्रीय सन्मानासाठी अपमानकारक आहे. (कारण) या निर्णयाला खुद्द झारची संमती होती आणि रिवाजानुसारच त्या करारावर आपला मित्र फ्रान्ससह सह्या करण्यात आल्या होत्या. व्होरोटिंत्सेव्ह म्हणतो की, त्या करारानुसार रशिया निर्णायक मदत करणार होता, आत्मघात नव्हे. ‘केवळ तुमच्या सहीने रशियाला आत्मघात करावा लागला’ असे तो आपल्या प्रमुखाला म्हणतो. तो प्रमुख म्हणजे यानुश्केविच, मान खाली घालतो. कारण त्यानेच नियोजित वेळेआधी चार दिवस फौजांना आगेकूच करण्यास सांगितलेले असते. त्यावेळी झिलिन्सकी ओरडतो की, तुमच्या युद्धमंत्र्यांनीही त्यावर सही केली होती. पण त्याच्या आवाजातील जोर आता कमी झालेला असतो. तो पुढे म्हणतो की, महाराजांनीही त्याला मान्यता दिली होती. तुझ्यासारख्या अधिकाऱ्याची मुख्यालयातच काय पण रशियन फौजेतही राहण्याची लायकी नाही. त्यावर ग्रँड ड्यूक व्होरोटिंत्सेव्हला म्हणतो, “कर्नल, तू तुझी मर्यादा ओलांडली आहेस. मी काही यासाठी तुला बोलायला परवानगी दिली नव्हती..”

व्होरोटिंत्सेव्हच्या डोळ्यापुढे आपल्या अधिकारी आणि सैनिकांची दुर्दशा येते. तो म्हणतो, “युवर इंपीरिअल हायनेस! तुम्ही आणि जनरल झिलिन्स्की तुमच्याप्रमाणेच मीही या सैन्यातील अधिकारी आहे आणि. आपण सारेजणच रशियाच्या इतिहासाला जबाबदार आहोत. केवळ लढाया हरत जाणे आपल्याला परवडण्याजोगे नाही, कारण असे झाल्यास उद्या फ्रान्सही आपला तिरस्कार करेल. त्याच्या या बोलण्याने ग्रँड ड्यूक भडकतो आणि व्होरोटिंत्सेव्हला बैठकीतून निघून जाण्यास फर्मावतो. व्होरोटिंत्सेव्हला सुटल्यासारखेच वाटते, तरीही उरात घुसलेला बाण काढल्यासारख्या वेदना जाणवत राहातात. ताडकन उभा राहून तो सलामी देतो आणि दाराकडे चालू लागतो. जाताना त्याला एक मदतनीस उत्साहाने येताना दिसतो. तो सांगतो, “युवर इंपीरिअल हायनेस, आताच फ्रान्सच्या दक्षिण भागातून तार आली आहे.” त्या क्षणाचीच बैठकीतील सर्वजण वाट बघत असतात. बैठकीतील सदस्यांकडे वळून ग्रँड ड्यूक त्यांना म्हणतो, “देवाच्या मातेने आपल्या रशियाला सोडलेले नाही! आपण ल्वोव शहर काबीज केले आहे. हा प्रचंड विजय आहे.” (खरे म्हणजे एका चकमकीतील सरशीबाबत हे सारे तो सांगतो आहे.) आपण ही बातमी वर्तमानपत्रांना द्यायलाच हवी. असे कादंबरीचे थोडक्यात कथानक.

शेवटानंतर इटॅलिक्समधील एकच ओळ आहे. Untruth did not begin with us, nor will it end with us. (असत्य हे आपल्यापासून सुरू झालेले नाही, आणि ते आपल्याबरोबर संपणारही नाही.)

सध्या आपण हेच अनुभवत आहोत. काहीही असत्य बोला, पण दडपून बोला. तेच बोलत राहणं हे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. त्यामुळे एखादी योजना जाहीर केल्याबरोबर ती अंमलात आलीच आहे, तिचे फायदे जनतेला मिळत आहेत असे सांगण्यात येते. परंतु कुणी पाहणी करून तसे काही झालेले नाही असे म्हटले तर त्याला देशद्रोही म्हणून तुरुंगात डांबून टाकायचे. जामीन हा नियम, कैद हा अपवाद हे अनेक जाणत्यांनी सांगितले तरी त्याकडे दुर्लक्षच होते, ते त्यामुळेच. कारण तसे झाल्यास, म्हणजे जामीन दिल्यास देणाऱ्यावरच गुन्हा नोंदवला जाण्याची भीती. आम्हाला कुणी काही सांगू शकत नाही, अशी वृत्ती. त्यामुळेच न्यायालयाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले जाते. इतकेच नाही तर त्या धुडकावून दिल्या जातात. अगदी केंद्रीय मंत्री यात अग्रभागी आहेत. अशा घटना 45 मंत्र्यांबाबत घडल्याचे मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. म्हणूनच आपले गुन्हेगार हे हिरो असल्याचे भासवले जाते. शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आल्यानंतर मंत्र्यांच्या हस्तेच त्यांचा सत्कार होतो, हे सर्वांनी पाहिलेच आहे. सोल्झेनित्सिनने अशा प्रकारची वचने या कादंबरीतील प्रकरणांच्या अखेरीस वापरली आहेत. त्यांच्यामुळेच ही कादंबरी वेगळी आणि परिणामकारक वाटते. एरवी एक युद्धकथा एवढीच ती राहिली असती. पण सत्य काय ते सांगणारी आणि त्याबरोबरच अशी वचने नोंदवणारी ही कादंबरी आहे.

रशियन फौजेला दिलेल्या हुकुमांमध्ये वारंवार बदल करण्यात येतात. रात्रभर चालून 20-25 कि. मी. अंतर अनेक अडथळ्यांवर प्रयासाने मात करत चालून गेल्यावर पुन्हा त्यांना लगेच परत मूळ जागी यायचा हुकूम होतो. आणि त्यांच्या हालात भर पडते. ते पुढे धोका आहे, असे सांगत असतानाच त्यांना पुढे जाऊन आक्रमण करण्यास सांगण्यात येते. हे वाचताना आधी निर्णय घ्यायचा, तो फिरवायचा हा प्रकार आठवतो. आपल्या चुकीच्या निर्णयांवर पांघरूण घालण्याच्या प्रयत्नांबाबत तो म्हणतो, “आपल्या कोटात विस्तव लपवून तुम्ही त्यापासून वाचू शकत नाही.” (You won't get away from fire by hiding it under your coat.) त्याचप्रमाणे आपल्याकडेही सत्य लपवले तरी ते लोकांपर्यंत पोहोचतेच आहे, हे आपण अनुभवानेच सांगू शकतो. अपवाद अर्थात भक्तगणांचा. काही वेळा हे लोक एखाद्या धोरणाचा तिरस्कार करतात कारण त्याने आपण भरडून निघणे त्यांना मान्य नसते. पण जेव्हा त्यांना त्या धोरणाला सामोरे जावे लागते तेव्हा ते त्याचे स्वागतच करतात. (The horse raddish hates being grated, but danses on the grater when it has 10.) काही वेळा कोड्याचे उत्तर अगदी छोटे असते, पण त्याखाली प्रचंड सत्य असते. आपल्याला अडचणीत आणेल असे कुणी बोलले किंवा वागले तर त्यातून मार्ग काढण्यासाठी (म्हणजेच कोड्याचे उत्तर म्हणून) लगेच त्याला देशद्रोही म्हणणे सोपे असते, पण त्या म्हणण्यामागील हेतू, त्यामागील सत्य ध्यानात आले तर मात्र ते भयानक असते, आपले दोष लपवण्यासाठीच हे करण्यात येते हेही वाचकांना माहीत असेलच.

आणखी एक वचन असेच आहे - 'प्राक्तन आपला बळी शोधत नाही, तर बळीच आपले प्रक्तन शोधतो.' (The fate does not seek it's victim - the victim seeks it's own fate.) आपल्याकडेही असेच झाले आहे. लोकांनीच आपले प्राक्तन ठरवले, म्हणजे जुमलेबाजीला बळी पडून त्या जुमलेबाजांना सत्ता दिली. आणि आता त्यांना ते प्राक्तन भोगावे लागत आहे. काही जण आपली चूक मान्य करतात पण अनेकजण जे काही झाले ते जणू झालेलेच नाही, असे वागतात. कारण अर्थातच काही प्रकटपणे बोलण्याची वा दर्शवण्याची भीती. येथेही स्तुतिपाठक भाटांचा, हुजरेगिरी करणाऱ्याचा, भीतीने चकारशब्दही न काढणाऱ्यांचा आणि भगतगणांचा अपवाद आहेच. पण सामान्य जनतेला मात्र आपण भरडून निघत असल्याचा अनुभव येत आहे. आपली भयानक अवस्था जाणवत आहे. हे महाग, ते महाग करता करता आता जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. जेवणाची भ्रांत पडणार का अशी शंका येत आहे. तरीही अजून ते आपला असंतोष प्रकट करण्यात धजावत नाहीत. आणीबाणीतही काही काळ जनतेची अशी अवस्था झाली होती. पण सारेच असह्य झाल्यावर व्हायचा तो उद्रेक झालाच. म्हणजे आता लोकांच्या सहनशक्तीचीच परीक्षा घेतली जात आहे, असे म्हणायचे. हळू आवाजात का असेना आता लोक बोलू लागले आहेत हे सुचिन्हच म्हणायचे. एक वचन असे आहे की, 'काय (चुकते) आहे हे गावभर शोधायला नको होते, तर तुम्ही आत्मपरीक्षण करायला, स्वतःतच शोध घ्यायला हवा होता.' (You shouldn't have searched in the village, but in yourself.) आता येथे तर आपल्याला सध्याचे परवलीचे वाक्य, खरे तर कांगावा, माहीत आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टीबाबत सत्ताधाऱ्यांवर टीका झाली, की ते म्हणणार आधीच्याच काळात असे झाले आहे. पण ते विसरतात की, तसे होणे लोकांना मान्य नव्हते म्हणूनच त्यांनी तुम्हाला संधी दिली आहे. अर्थात तुम्हीही असेच वागलात तर तुमची गतही आज ना उद्या तशीच होईल.

आता सोल्झेनित्सिनची आणखी इतर काही वचने वाचकांपुढे सादर करत आहे. ती नक्कीच विचार करण्याजोगी आहेत आणि वाचक तसे करतील याची खात्री आहे. युद्धामुळे एक उद्दिष्ट नक्कीच साध्य होते, ते म्हणजे देशातील जुलमांवर पांघरूण घालण्याचे. निवडणुकीच्या तोंडावरच घातपाती कृत्ये वा लढाईला प्रारंभ केला, की मग लोकांचे जुलमाकडे दुर्लक्ष होते. केवळ देशासाठी (स्वघोषित देशभक्तांसाठी नाही) ते विसरायला तयार होतात. इतकेच नाही, तर सहानुभूतीने त्यांनाच ते देतात. हे आपण अनुभवले आहे. कारण हे निमित्त करून आम्ही शत्रूच्या मुलखात जाऊन त्यांना धडा शिकवला. अर्थात त्याच्या खरेपणाबाबतही शंका आहेतच. कारण हल्ला करणाऱ्या विमानांच्या ताफ्यातील ज्या विमानात चित्रीकरण करण्याचा कॅमेरा होता, ते विमान उड्डाणच करू शकले नव्हते असे एका लष्करी अधिकाऱ्यानेच सांगितल्याचे इंग्रजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. (त्याचा कुणीही इन्कार केला नाही.) त्यामुळेच ते लोकांना दाखवलेले फोटो आणि चित्रण खरे की बनावट हे कधीच कळणार नाही, पुढेमागे ते सारे बनावट असल्याचे कुणी तज्ज्ञाने शोधून दाखवले तरी नक्कीच मान्य केले जाणार नाही. (अशा बनावटगिरीसाठी तर सध्याच्या सत्ताधारी पक्षाची खास यंत्रणा आहे, हे ही अनेकदा सिद्ध झाले आहेच की.) पण मुळात जे घातपाती कृत्य आपल्याच देशात घडले, तेही लष्कराच्या वाहनातून आलेल्या स्फोटकांनी केले गेले होते, हे प्रसिद्ध झाल्यावरही त्याबाबत मात्र अजूनही काही बोलले जात नाही. हे कुणी केले हे अजूनही सांगण्यात आलेले नाही, त्यामुळे ते कुणीतरी घडवून आणले अशी शंका त्यामुळेच आता बोलून दाखवली जाऊ लागली आहे. पण करणाऱ्यांचे काम झाले. नोटाबंदी इ. विसरून लोकांनी पुन्हा त्यांना सत्ता दिली.

आणि शेवटी आणखी एक वचन. लोकशाहीचे चार स्तंभ आपल्याला माहीतच आहेत. तेच राज्याचेही आधारस्तंभ असतात. म्हणून हे वचन - 'खोटे (असत्य गोष्ट) हे आता केवळ नैतिक बाब बनलेले नाही, तर ते राज्याचा एक आधारस्तंभ बनले आहे.' (The lie has become not just a moral category, but a pillar of state.)

सुज्ञांस अधिक सांगणे नलगे!

-  आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: इंग्रजी साहित्य राजकारण आयडिऑलॉजी सोव्हिएत झिलिन्सकी Load More Tags

Add Comment

संबंधित लेख