चेस ऑलिंपियाडच्या निमित्ताने...

मल्लपुरम येथे गुरुवारी 44 व्या चेस ऑलिंपियाडचे उद्घाटन झाले.

mathrubhumi.com

चेन्नईपासून जवळच असलेल्या मल्लपुरम येथे गुरुवारी 44 व्या चेस ऑलिंपियाडचे उद्घाटन झाले. शुक्रवार 29 जुलैपासून सामने सुरू होत आहेत. भारताला ही मानाची स्पर्धा आयोजित करण्याचा मान प्रथमच मिळाला आहे आणि आशिया खंडात ही स्पर्धा फक्त दुसऱ्यांदा होत आहे.

44 वी चेस ऑलिंपियाड स्पर्धा खरे तर मुळात रशियामध्ये होणार होती. पण फेब्रुवारी महिन्यात रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे तिच्या आयोजनाची संधी भारताला मिळाली. कारण त्या आक्रमणामुळे रशियाला ही स्पर्धा आयोजित करण्यास मनाई करण्यात आली. आता हा मान भारताला मिळाला आहे. कारण स्पर्धेसाठी आता नवे ठिकाण ठरवावे लागणार हे कळताच भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे भरतसिंग यांनी जोमाने प्रयत्न केले आणि तामिळनाडू सरकारला या स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्याची विनंती केली. तामिळनाडू सरकारने मोठ्या खुशीने ती ताबडतोब ती मान्य केली, इतकेच नाही, तर त्यासाठी 92 कोटी रुपयेही तातडीने मंजूर केले. त्यामुळे भारताला यजमानपद मिळणे सुकर झाले.

केवळ चार महिन्यांमध्ये जागतिक पातळीवरील या स्पर्धेचे आयोजन हे मोठेच आव्हान होते. परंतु तामिळनाडूने ते शक्य करून दाखवले. आयोजन यशस्वी व्हावे म्हणून तयारीवर लक्ष ठेवण्यासाठी 37 आयएएस अधिकारी नियुक्त केले. 'तंबी' हे स्पर्धेचे शुभचिन्ह बनवले. त्यात बुद्धिबळातील घोडा पारंपरिक पोशाखात म्हणजे वेष्टी परिधान केलेला दिसतो. बुद्धिबळगीतासाठी संगीतकार ए. आर. रेहमानची नियुक्ती केली. स्पर्धा होणार त्या ठिकाणी असलेले दोन प्रशस्त हॉल, स्पर्धकांसाठीची व्यवस्था यांची उपलब्धी करून दिली. कारण एकूण 700 पटांवर सामने होणार आहेत. खेळाडूंच्या, त्यांच्या सहायकांच्या वाहतुकीची सोय केली. त्यासाठी 30 हॉटेलमधील 1800 पंचतारांकित खोल्या आणि अन्य 650 चौतारांकित खोल्या राखून ठेवण्याची खबरदारी घेतली. त्यासाठी अद्ययावत आलिशान वाहनांचा ताफा सज्ज केला. हे करणे आवश्यकच होते, कारण स्पर्धेसाठी तब्बल 187 देशांतील 1400 खेळाडू आणि त्यांचे सहायक प्रशिक्षक वगैरे धरून एकूण 3000 हून अधिक लोक येणार होते. स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या. विशेष म्हणजे अनेक रस्ते, लोकल गाड्या, बसेस वगैरे सारे काही बुद्धिबळाच्या पटासारखे रंगवले. त्यामुळे सारे तामिळनाडू राज्यच जणू बुद्धिबळमय होऊन गेले..

यजमान भारताचे पुरुष व महिलांचे तीन संघ या स्पर्धेत उतरत आहेत. खरे तर यजमानांना दोन संघ उतरवता येतात पण भारताला ही खास परवानगी देण्यात आली आहे. या सहा संघांतून देशातील 30 अव्वल खेळाडू पदकांसाठी प्रयत्नशील असतील. भारतीय संघाचे मार्गदर्शन माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद करणार आहे, त्यामुळे तो खेळणार नसल्याची खंत बरीच कमी झाली आहे. भारताने 2014 मध्ये या स्पर्धेत प्रथमच ब्राँझपदक मिळवले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाइन स्पर्धेत भारताने रशियाबरोबर संयुक्त विजेतेपद मिळवले तर गेल्या वर्षी ब्राँझपदक संपादन केले होते.

भारताच्या पुरुष आणि महिला संघांना दिलेली मानांकने: पुरुष संघ 1: दुसरे, संघ 2: 11वे, संघ 3: 17 वे. महिला संघ 1: पहिले, संघ 2: 11 वे, संघ 3: 16 वे. पहिले मानांकन अमेरिकेला आहे आणि विजेतेपदासाठी तो प्रमुख दावेदार मानला जात असला तरी तो आणि भारत यांच्यात अटीतटीची स्पर्धा होईल असा अंदाज आहे. पुरुष विजेत्या संघाला हॅमिल्टन रसेल चषक तर महिला विजेत्या संघाला व्हेरा मेंचिक चषक मिळेल. पुरुष गटात 187 तर महिला गटात 162 संघ सहभागी होणार आहेत.

सर्वांनाच ठाऊक आहे की, बुद्धिबळ हा खराखुरा भारतीय खेळ आहे. अगदी प्राचीन काळापासून भारतात तो खेळला जातो. त्याला चतुरंग असेही एक नाव आहे. भारतातूनच त्याचा प्रसार जगभर झाला. पण अन्य गोष्टींप्रमाणे इतर देशांनी त्यात खूपच प्रगती केली. भारत मागेच राहिला. 1980 च्या दशकाअखेरीस विश्वनाथन आनंद ग्रँडमास्टर बनला, तोवर भारतात एकही ग्रँडमास्टर नव्हता. परंतु आनंदच्या या यशामुळे भारतामध्ये बुद्धिबळाची लोकप्रियता वाढली. अनेक तरुण खेळाडू बुद्धिबळ खेळू लागले. 1960च्या दशकात मॅन्युएल एरन हा भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय मास्टर होता. त्यावेळीही श्रीकृष्ण साखळकर, रामचंद्र सप्रे असे प्रख्यात खेळाडू होते आणि त्यांनी काही महत्त्वाचे सामने जिंकलेही होते. भाग्यश्री साठे ही भारतातील पहिली महिला ग्रँडमास्टर होती. आता मात्र परिस्थिती खूपच बदलली आहे. आजमितीला भारतामध्ये 74 ग्रँडमास्टर आणि 18 महिला ग्रँडमास्टर आहेत. आंतरराष्ट्रीय मास्टर 125, तर महिलांमध्ये ही संख्या 442 आहे. त्यामुळेच भारतात होणाऱ्या स्पर्धांत सहभागी होण्यासाठी परदेशी खेळाडू उत्सुक असतात. तरीही या खेळात तामिळनाडूचेच वर्चस्व राहिले होते, हे सर्वमान्य आहे. तसे महाराष्ट्रातही हा खेळ पूर्वापार चालत आला आहे, हे आपल्याला शिवशाही आणि पेशवाईतील काही प्रसंगांवरून समजते.

परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने आधुनिक बुद्धिबळाच्या भारतातील इतिहासात बंगालचे - खास करून कलकत्त्याचे (आता कोलकाता) - स्थान महत्त्वाचे आहे, असे पुराव्यांनिशी सांगणारा लेख उद्दालक बॅनर्जी यांनी 27 जुलैच्या ‘टेलीग्राफ’मध्ये लिहिला आहे. बुद्धिबळ रसिक आणि वाचकांसाठी त्यातील महत्त्वाचा भाग थोडक्यात देत आहे. बॅनर्जी म्हणतात, ‘बुद्धिबळ हा खेळ आगळाच आहे कारण त्यात माणसाच्या बुद्धीची कसोटी लागते. म्हणून त्यातील अव्वल खेळाडूंना एक्सेंट्रिक, अत्यंत लहरी म्हटले जाते. तर काहीजण हा खेळ म्हणजे मानवासाठी कसरतीची व्यायामशाळा (जिम्नॅशियम) आहे असे म्हणतात. विश्वनाथन आनंदने भारतात या खेळात क्रांती घडवली हे सर्वमान्य आहे. पण कलकत्त्यानेही शांतपणे हा खेळ सर्व लोकांपर्यंत पोहोचवला आहे. तेथे गारिआहाट चेस क्लब होता. तोही हमरस्त्याच्या बाजूलाच एका पुलाखाली होता. तेथे अव्वल खेळाडू होते आणि ते रहदारीच्या आवाजातच खेळ रंगवीत.

1851 च्या ‘चेस प्लेअर्स क्रॉनिकल’मध्ये एक नोंद आहे. ती अशी - गेल्या वर्षाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत एम यांनी गावापासून 20 मैलावरही कधी मजल मारली नव्हती. ते 'चांगल्या' खेळाडूंबरोबर कधी खेळले नव्हते. आणि युरोपीय पद्धतीचे खेळण्याचे नियमही त्यांना माहीत नव्हते. तरीही ते खेळत होते आणि जिंकतही होते. त्यांच्या डावाची सुरुवात करण्याच्या पद्धती- ओपनिंग चुकीच्या होत्या, त्या बदलल्या नव्हत्या. एम यांची कलकत्त्याशी ओळख झाली ती अशी. कलकत्ता चेस क्लबच्या एका सदस्याने, त्यावेळी (साधारण 1848 च्या सुमाराला) अजिंक्य असलेल्या एम याच्यावर मात करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती. पण तसे होणे नव्हते. आमच्या या ब्राह्मणाने त्यांना सपशेल हरवले. त्यानंतर त्या पराभूत सदस्याने एम यांना कलकत्त्याला आणले.


हेही वाचा : इंदिरा संतांचे सुकुमार शब्दशिल्प - सोमनाथ कोमरपंत


यातील एम असा उल्लेख असलेला खेळाडू म्हणजे मोहेशचंदर बॅनर्जी. त्यांना त्या क्लबने पगारी नोकर म्हणून काम दिले. त्याने स्कॉटिश वकील जॉन कोचरॉन यांच्याबरोबर अनेक सामने खेळले. कोचरॉन यांनी अभ्यास म्हणून त्या डावांची नोंद करून ठेवली होती. 'साहेब' आणि 'बाबू' अशा त्या लढती झाल्या होत्या. डब्ल्यू. सार्जंट याने 1934 मध्ये नोंदवले आहे की, ‘युरोपियन खेळाडूंना भारतीय बचावाची पद्धत आज मोहेशचंदर बॅनर्जी यांच्या उदाहरणाने शिकवण्यात येते.’ त्यावेळी भारतीय बुद्धिबळ खेळाडू 'बाबू' ईश्वरचंद्र गोसेन, महादेव चौबे, श्यामचरण चक्रवर्ती आणि पीतांबर मुखोपाध्याय इ. होते.’ एवढे सांगून उद्दालक म्हणतात की, याबाबत अधिक संशोधन होण्याची गरज आहे...

कलकत्त्याने चतुरंग पुरता आत्मसात केला होता. इतकेच नाही, तर तेव्हा एक आंतरराष्ट्रीय सामना लिव्हरपूलचे खेळाडू आणि कलकत्ता खेळाडू यांच्यात झाला होता. त्यावेळी खेळाडूंच्या चाली तारेने दोन्हीकडे कळवल्या जात होत्या. (कोविड काळातील गेल्या दोन स्पर्धा आंतरजालावरच, ऑनलाइन झाल्याचे आपल्याला आठवेल). कलकत्त्यात या खेळाला चांगला वाव होता आणि लोकप्रियताही होती. आणि या खेळाच्या आश्रयदात्यांत टागोर, देव, घोष अशांबरोबर एका सामान्याचेही नाव आदराने घेतले जाते, ते मोहेशचंदर बॅनर्जीचे !

खरे तर भारताच्या इतर राज्यांमध्येही असे काही घडले असेलच, त्याचा शोध घ्यायला हवा. महाराष्ट्रातही बुद्धिबळाचे उल्लेख इतिहासात काही वेळा आढळतात. त्यावरही संशोधन करायला हवे.

वाचकांसाठी भारताच्या संघांतील खेळाडूंची नावे देत आहे. पुढे कंसामध्ये त्या गटाचे मानांकन दिले आहे. पुरुष: संघ 1: विदित गुजराथी, पी. हरिकृष्ण, के, शशीकिरण, अर्जुन एरिगैसी आणि एस. एल. नारायणन (2). संघ 2: आर. प्रज्ञानंद, निहाल सरीन, डी. गुकेश, रौनक साधवानी आणि बी. अभिबान (11). संघ 3: सूर्यशेखर गांगुली, एस. पी. सेतुरामन, अभिजित गुप्ता, कार्तिकेयन मुरली आणि अभिमन्यू पुराणिक (17).

महिला: संघ 1: कोनेरू हंपी, हारिका द्रोणवल्ली, तानिया सचदेव, आर. वैशाली आणि भक्ती कुलकर्णी (1). संघ 2: सौम्या स्वामिनाथन, मेरी ॲन गोम्स, पद्मिनी राऊत, वंतिका अगरवाल आणि दिव्या देशमुख (16). संघ 3: ईशा करवडे, सहिती वार्षेनी, प्रत्यशा बोड्डा, नंदिधा पी. व्ही. आणि विश्वा वस्तावाला (16).

प्रत्येक सामन्यात संघातील चार खेळाडू सहभागी होतील. एवढ्या साऱ्या माहितीनंतर आता सामन्यांच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असणार हे वेगळे सांगायला नको. आपल्या सर्वांच्या वतीने भारतीय संघांना शुभेच्छा.

-  आ. श्री. केतकर
aashriketkar@gmail.com
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Tags: Chess Olympiad International Chess Federation West Bengal Chennai Load More Tags

Comments:

Nice article sir

Nice information about chaturang

Add Comment