चतुरस्र शांताबाई!

12 ऑक्टोबर : कवयित्री शांताबाईं शेळके यांच्या 101 व्या जन्मदिवसानिमित्ताने...

‘सर्व काही व्यर्थ आहे जाणते मी’ असं असूनही जीवनाचा हा खेळ त्या समरसून खेळल्या. म्हणूनच सारे आनंदी भाव जगासाठी ठेवून कवितेत मात्र केवळ त्या स्वतः उरल्या. ‘हृदयावरचे अदृश्य ओझे उतरवण्याचे’ निकटचे स्थान अशी त्यांची कविता आहे. त्यातला सूर अत्यंत आत्ममग्न आहे. ‘कुणीही आत शिरकाव करु न शकणारा कोश मी स्वतःभोवती विणत राहिले’, असं त्यांनी लिहिलंय ते म्हणूनच!

‘प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा माझा ठसा’

असं अगदी आत्मविश्वासानं लिहिणाऱ्या शांताबाईंसारखं एकूणच साहित्यावर मनःपूर्वक प्रेम करणारं व्यक्तिमत्त्व विरळा. त्यांचं शब्दांवर असणारं प्रेम किती तऱ्हांनी प्रकटलं आहे! शब्दांशी अगदी न कळत्या वयात त्यांचं नातं जुळलं आणि त्या शब्दांच्याच होऊन गेल्या. शब्दांवेगळं अस्तिवच नव्हतं जणू त्यांना. आणि तरी कधीतरी त्यांनी म्हटलं आहे, मी कधीचीच शब्दांची ते कधी होतील माझे...

कवयित्री आणि गीतकार अशी मुख्य ओळख असणाऱ्या शांताबाईंनी अगदी सुरुवातीपासून म्हणजे 1944 पासून कथा लिहिल्या. ‘ओढ’, ‘धर्म’, ‘मायेचा पाझर’ सारख्या आठ-नऊ कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. ललितलेखन, सदरलेखन यांची 40 च्यावर पुस्तकं आहेत. कितीतरी अनुवाद आहेत. बालसाहित्य आहे. चित्रपटगीतसंग्रह, कवितासंग्रह तर आहेतच. शिवाय संपादनंही! विनोद आणि नाटक वगळता त्यांनी अगदी मुक्त संचार केला साहित्यविश्वात.

त्यातही ललितगद्य हा साहित्यप्रकार शांताबाईंनी सातत्यानं हाताळला. श्री. म. माटे हे त्यांचे स. प. महाविद्यालयातले गुरु. ते एकदा त्यांना म्हणाले होते, “काही अनुभव बचकेने उचलायचे असतात तर काही चिमटीने..” शांताबाईंच्या ललितगद्यात असे चिमटीने उचललेले कितीतरी अनुभव आहेत. त्या म्हणत की ‘डोळे उघडे ठेऊन वावरणाऱ्या कुणालाही विषयचा तुटवडा पडू नये.’ खरोखर रोजच्या जगण्यातले अनेक अनुभव, व्यक्ती आणि विचार ही त्यांच्या ललितगद्याची प्रेरणा आहे. निसर्गवर्णन, व्यक्तिचित्र, प्रवासलेख, स्मृतीलेख, पत्र, परीक्षण, आस्वाद असं सर्व प्रकारचं लेखन त्यांनी केलं आहे. अगदी कोणत्याही विषयावर त्यांनी सहज, उत्कट आणि वाचनीय लिहिलं. एकपानी ते साताठ पानी असा लवचिक विस्तार आहे त्याचा. सिनेमे म्हणू नका, चित्रे म्हणू नका की विविध कलावंतांची चरित्रे म्हणू नका. शांताबाईंच्या नजरेत सारे येत होते आणि स्मृतीसंपुटात साठवले जात होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात खमंग खाण्याचे, गोड गाण्यांचे उल्लेख जसे अगदी स्वाभाविक वाटतात, तसेच कालिदास भवभूतीचेही. कधी नॉर्वेजिअन नटी लिव उलमनचं आत्मचरित्र त्या आपल्यासमोर उलगडतात तर कधी लॉरेन्स ओलिव्हिए या प्रख्यात अभिनेत्याचे उद्गार कसे नवीच प्रतीती देतात याविषयी लिहितात. कधी चीनी म्हणीचा उल्लेख करुन ‘सहावे सुख’ या विषयी चिंतन करतात. खऱ्या अर्थानं मोकळ्या होतात आणि फुलून येतात ते या ललित गद्यलेखनात. त्यांना बोलण्याची जी हौस होती ती या लेखनाला बोलकं आणि ओघवतं आणि प्रवाही बनवते. वचने, सुभाषिते, कवितेच्या ओळी, प्राचीन ते अत्याधुनिक साहित्यातले दाखले त्यांचा विषय उजळत राहतात. वृत्तीची उत्कटता आणि शैलीची काव्यात्मता त्यांचे लेखन रसरशीत बनवते.

ललित गद्यात केंद्रस्थानी असतो तो लेखक स्वतः! त्याचा अनुभव! आणि तो व्यक्त होतो तोही लेखकाचा अनुभव म्हणूनच. म्हणजे ललितगद्यातला ‘मी’ हा स्वतः लेखक असतो. कविता, कथा किंवा कादंबरीत तसं नसतं. त्यामुळे लेखकाचं व्यक्तिमत्त्व ललितगद्यलेखनात प्रतिबिंब उमटावं तसं स्वच्छ उमटतं. ललितलेखनातून दिसणारं शांताबाईंचं रूप कसं आहे? सहज, स्वाभाविक. गप्पिष्ट. मोकळं. ललितकलांविषयीची संवेदनात्मक जाणीव असणारं , लोकांत प्रिय असणारं, जीवनाविषयी अपार कुतूहल असणारं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारच्या साहित्यावर आणि कलांवरदेखील नितांत प्रेम करणारं. खरोखर शांताबाई हाती लागेल ते वाचत, अगदी ‘कार्लाईलचा किल्लेदार’ ते ‘कालिदास भवभूती’...!  आणि विलक्षण स्मरणशक्तीची देणगी त्यांना लाभली होती. त्यामुळे या प्रचंड वाचनातले अगणित संदर्भ, कवितेच्या ओळी, किस्से, त्यांना नेमके आठवत आणि त्यांच्या लेखनात सहजपणे जागा पटकावत. या सहजतेमुळे पढिक पांडित्याचा गर्विष्ठ दर्प त्याला येत नाही. कमालीची संवादी वृत्ती असल्यामुळे त्यात वेल्हाळपण आलंय. सदरलेखनाविषयी त्यांनी म्हटलं आहे, ‘अशा प्रकाराच्या लेखनाची पहिली प्रेरणा पैसा ही असेलही – नव्हे असतेच, पण तो काही त्याचा शेवट नव्हे,’ म्हणजे त्यांना याची जाणीव होतीच. आणि त्याचा त्यांनी विचारही केला होता. गरजेपोटी त्यांनी गाईड्स लिहिली, अन्य मागणीनुसार लेखन केलं पण त्यांचा कधीही असा दावा नव्हता की त्या साऱ्या कलाकृती आहेत. त्यांच्या मोकळ्या, साध्या आणि स्वागतशील वृत्तीचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात सदैव पडलं आणि ते लव्हेबल आहे. त्यांची मराठी फार वेल्हाळ आहे. क्वचितच कधी तिच्यात इंग्रजी शब्द येतो. ती जुन्या-नव्या साहित्याच्या वाचनावर पोसली आहे.

‘माणसाखालोखाल मला निसर्ग प्रिय आहे’, असं त्यांनी म्हटलं आहे. खरोखर याचं प्रत्यंतर आपल्याला त्यांच्या लेखनात येतं. माणसात वावरताना येणारे अनुभव जसे त्यात संख्येनं जास्त आहेत तसेच निसर्ग सहवासाचेही. निसर्गाशी समरस होण्याचं अंग त्यांना पिंडातूनच मिळालं होतं. त्यांची काही शीर्षकेच पाहा... पावसाआधीचा पाऊस, ललित नभी मेघ चार, गुलाब, काटे, कळ्या...

सातत्याने केलेलं वाचन आणि लेखन, अनुभव उत्कटतेनं घेणं, आविष्कारातली सहजता, शैलीतलं लालित्य, अनुभव मांडताना त्यावर ठायी ठायी केलेली चिंतनपर भाष्यं यांमुळे त्यांच्या ललितगद्याला त्यांचा विशिष्ट असा रंग आहे. त्यांच्या ज्ञानाची उब आहे आणि ते रंजकही आहे. त्यात तोरा नाही भपका नाही. काही विशेष सांगतेय असा अविर्भाव नाही. ‘वडीलधारी माणसे’मध्ये त्यांनी ज्यांच्याविषयी लिहिलं आहे त्यात काही सर्वजण वडीलधारे नाहीत! त्यात काही व्यक्तिचित्रं उत्कृष्ट उतरली आहेत. विशेषतः ‘वहिनी’ हे त्यांच्या आईचं आणि ‘दुर्गाबाई’ हे. आणखी या प्रकारचं लेखन त्यांनी करायला हवं होतं असं वाटावं इतकी अप्रतिम!

पुलं आणि सुनीताबाईंसमवेत.. 

प्रांजळपणा हा स्वभावविशेष त्यांच्या लेखनातही दिसतो. ‘एखादी गोष्ट आठवत नाही आता, असं त्या सहज म्हणून मोकळ्या होतात. ‘आपण जे लिहिले आहे ते चार लोकांपुढे आले पाहिजे, त्यांनी ते वाचले पाहिजे’ ही ऊर्मीही कविता लिहिण्याच्या उर्मीइतकीच प्रबळ होती, हेही शांताबाईंनी प्रांजळपणे सांगितले आहे. त्याशिवाय ‘निर्मितीच्या आनंदाला परिपूर्णता येत नाही’ हे त्यांनी जाणले होते. कादंबरीविषयी त्यांनी म्हटलं आहे, “कादंबरी हा मला न जमलेला साहित्यप्रकार आहे... आता वाईट वाटतं की कादंबरी निर्माण करु शकतील असे विषय त्या वेळी आमच्या जातीत, आसपासच्या घरांत कितीतरी होते.. त्यात अंतर्भूत असलेली कथानके, व्यक्ती, घटना, प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर मला दिसत होते. पण त्यातले जिवंतपण मला कधी पकडता आले नाही.” स्वतःच्या लेखनाची इतकी वस्तुनिष्ठपणे चिरफाड क्वचितच अन्य कोणा लेखकाने केली असेल.

कविता आणि गीते

शब्दांच्या माध्यमातून शांताबाईंच्या ओळखीची झालेली कवितेची रूपं छापील स्वरुपात नव्हतीच! अगदी न कळत्या वयात कानावर पडलेली गाणी, श्लोक यांनी त्या नादावून गेल्या होत्या. शांताबाईंनी म्हटलं आहे, “तिच्यातल्या नादाचे नर्तन, तिचे लडिवाळ खटके, तिची विशिष्ट लय, बोलीभाषेच्या संगतीने प्रकट होणारे तिचे मनोगत या सर्वांनी मला अगदी मोहून टाकले.”

शब्द, त्यांचा नाद, त्यांची पुनरुक्ती, त्यातून उठणारी उच्चारांची मजेशीर वलये याचं त्यांना वेड लागलं होतं आणि शाळकरी वयात लागलेलं हे कवितेचं वेड वाढत गेलं. पोरवय सरत गेलं आणि आधुनिक कवितेच्या प्रांगणात त्यांचा प्रवेश झाला. बालकवी, रविकिरण मंडळाचे कवी – विशेषतः माधव जूलियन- यांच्या कवितेची त्यांच्या जीवाला भुरळ पडली. 1942-44 नंतरच्या काळात मात्र मर्ढेकरांच्या कवितेने त्यांच्या ‘मनात जणू धरणीकंप’ झाला. त्यांच्या कल्पनेतील कवितेविषयीचे सगळे दिखाऊ, सुबक संकेत जमीनदोस्त झाले. काव्यविषयक जाणिवा पार बदलून गेल्या. ‘कविता ही एक काळजाला झोंबणारी, जीवन व्यापून टाकणारी, स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याची अगदी वेगळी दृष्टी देणारी शक्ती आहे. तो आनंद आहे; तशीच वेदना आहे’ याची तीव्र जाणीव त्यांना झाली. पण म्हणून त्यांची कविता बदलली असं नाही. शांताबाईची कविता भावगंभीर गाभ्याची कविता आहे. ‘दिवसगतीने फिकाच पडतो, रंग सुखाच्या गडद क्षणांचा’ ही जीवनाची उमज तिच्यात आहे. ‘अर्घ्य जसा ओंजळीत धरला जन्म उभा शिणलेला..’ जगताना आलेला सगळा शिणवठा, उदासीनता त्यांनी ‘अर्घ्य धरावे आणि अर्पावे’ तसा ओंजळीत धरला आहे, असं म्हटलं आहे. म्हणूनच कदाचित त्यांच्या कवितेत जीवनातला अटळ एकाकीपणा आणि शीण , दुःख आणि शल्ये प्रकटूनही कडवटपणा किंवा संताप दिसत नाही. त्यांचा जीवनावरचा लोभ उणावलेला दिसत नाही.

‘पापणी श्रांत लवताना मी विसरू बघते काही’

अशी स्वतःच स्वतःला अनोळखी असण्याची आणि एकाकीपणाची गडद जाणीव तिच्यात आहे. अनाम भीती, आधारासाठी पार्थिवावर विसंबून राहण्याऐवजी निराकार तत्त्वाकडे वळणं.. हेही पुनःपुन्हा दिसतं तिच्यात.

‘सर्व काही व्यर्थ आहे जाणते मी’ असं असूनही जीवनाचा हा खेळ त्या समरसून खेळल्या. म्हणूनच सारे आनंदी भाव जगासाठी ठेवून कवितेत मात्र केवळ त्या स्वतः उरल्या. ‘हृदयावरचे अदृश्य ओझे उतरवण्याचे’ निकटचे स्थान अशी त्यांची कविता आहे. त्यातला सूर अत्यंत आत्ममग्न आहे. ‘कुणीही आत शिरकाव करु न शकणारा कोश मी स्वतःभोवती विणत राहिले’, असं त्यांनी लिहिलंय ते म्हणूनच!

कविता आणि गीत या दोहोंमागच्या प्रेरणा भिन्न असतात तशीच त्यांची कलात्मक मागणीही वेगळ्या प्रकारची असते. गूढता, सूचकता, अल्पाक्षरत्व आणि संपूर्ण व्यक्तिगत अनुभवांमुळे येणारी पृथगात्मता हे कवितेसाठी आवश्यक असणारे गुण गीतरचनेला मात्र बाधक ठरतात. सोपेपणा, सहजता, ऐकता क्षणी मनात अर्थ उलगडत जाईल अशी शब्दकळा ही गीताची गरज असते, हे जाणून घेऊन शांताबाईंनी आकाशवाणी, चित्रपट आणि ध्वनिमुद्रिका या सर्व माध्यमांसाठी विपुल गीतरचना केली. उत्तम गीतरचनेसाठी आवश्यक ते संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले होते. गेय कवितेच्या विपुल श्रवणामुळे आकर्षक धृवपद, सोपी व नादमधुर रचना, चित्रदर्शी वर्णनशैली व नाट्यात्मता हे गीतगुण हे त्यांच्या गीतरचनेत आपसूकच उतरले. लोकगीतांच्या चालींचा गोडवा, कानाला रिझवणारे खटके त्यांच्या गीतांत सहजपणे येत गेले. 

शांताबाईंच्या हस्ताक्षरातले त्यांचे एक प्रसिद्ध गीत

“गीतरचना हा प्रकार एका वेगळ्या तऱ्हेने आनंददायक आहे. कागदावर निर्जीव वाटणारे गाणे नंतर कलेकलेने उमलत जाते. सुरांशी बिलगताना, वाद्यांच्या साथीने उमटताना, गायकाच्या किंवा गायिकेच्या कंठातून चैतन्यमय होताना ते अंग धरते, उभे राहते. नाचू लागते. हे सर्व बघणे हा रोमांचकारक अनुभव आहे.” त्यांच्या या स्वागतशील आणि मोकळ्या वृत्तीमुळे त्या अनेक वर्षं गीतलेखनाचा आनंद घेऊ शकल्या.

लोकोत्सवात वावरणाऱ्या, प्रसन्न आणि मोकळ्या वाटणाऱ्या शांताबाई त्यांच्या कवितेत फार वेगळ्या दिसतात. त्यांचं ललितलेखन जीवन रसरसून भोगणाऱ्या, मोकळ्या, गप्पिष्ट, साहित्यावर नितांत प्रेम करणाऱ्या वृत्तीचे प्रतिबिंब आहे. ललितलेखन आणि कविता हे दोन्ही प्रकार आत्मनिष्ठ. इंदिरा संत यांचं ‘मृद्गंध’मधलं लेखन आणि त्यांची कविता एकाच गाभ्यातून आलं आहे, त्याचा प्रत्यय एकाच जातकुळीचा आहे. तसं शांताबाईंच्या कविता आणि त्यांचं ललितलेखन नाही. आपलं अगदी गाभ्यातलं मन; तेही पूर्णपणे नव्हे, पण बऱ्याच अंशी त्यांनी कवितेकडे सोपवलं, असं दिसतं. त्यांची गीतं आणि त्यांचं ललितलेखन प्रसन्न, मोकळ्या, संवादी स्वरातलं आहे. तर भावकविता केवळ अंतर्मनातला हुंकार असावा, तशी आहे.


हेही वाचा : हुड सावल्या उन्हाच्या : कवितेमागची कथा - कल्पना दुधाळ


बाह्य घडामोडी आणि त्यांवरील त्यांच्या मनात उमटणाऱ्या प्रतिक्रिया या रेषा त्यांच्या कवितेत किंवा अन्य लेखनात कधी एकमेकींना भिडल्या नाहीत. त्यांची वाटचाल समांतर राहिली. भावपरता हा शांताबाईंच्या पिंडाचा भाग होता. उत्कट आणि अत्यंत संवेदनशील मनावर उमटलेले अनुभूतीचे खोल ठसे त्यांच्या लेखनात उमटले आहेत. आरती प्रभू यांच्यावरचा ‘सुंदरतेला झोंबलेली कुसे’ हा लेख काय किंवा इंदिरा संत यांच्या ‘मृद्गंध’वरील लेख काय, शांताबाईंचं हे समीक्षापर लेखनही त्यांच्या भावपर पिंडाचा आविष्कार आहे. त्यात वस्तुनिष्ठेपेक्षा जिव्हाळा अधिक आहे. समीक्षेच्या तात्त्विक बैठकीपेक्षा आस्वाद घेण्याकडे, आणि शिक्षकी पेशा असल्यामुळे समजून देण्याकडे त्यांचा कल आहे.

लोकांतामधल्या शांताबाई आणि एकांतामधल्या शांताबाई ही शांताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची दोन रूपं होती. त्यांनीच एका कवितेत म्हटल्याप्रमाणे, झाडाची मुळे जमिनीखालचे जगणे स्वीकारतात तशी जीवनाची तळमाती शोधू पाहणारी अतिसंवेदनशील कवयित्री त्यांच्या भावकवितेत भेटते. आणि त्यांची गीतं व अन्य लेखन झाडाच्या पालवीचा डौल व प्रसन्न मोकळा बहर मिरवतं!

- वंदना बोकील-कुलकर्णी
vandanabk63@gmail.com 
(लेखक, अनुवादक, अभिवाचक, मुलाखतकार असे इतर अनेक आयाम असलेल्या वंदना बोकील-कुलकर्णी या 'संवादसेतू'च्या संपादक आहेत. तसेच शांताबाईंच्या लेखनावर आधारित 'अनवट शांताबाई' हा लोकप्रिय कार्यक्रम त्यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. 12 जानेवारी 2023ला सायंकाळी 6.30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होतो आहे.)


1996 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या, डॉ. माधवी वैद्य दिग्दर्शित 'कवी शब्दांचे ईश्वर' या मालिकेतील शांताबाईंवरील माहितीपट : 

 

Tags: कविता जन्मशताब्दी शांता शेळके मराठी साहित्य काव्य कालिदास ललित व्यक्तिवेध shanta shelke poetry marathi literature vandana bokil kulkarni Load More Tags

Add Comment

संबंधित लेख